प्रतिनिधी – मंचर
आपल्या राज्यात उद्योगाला दिली जाणारी वीज ही सर्वात महागडी वीज आहे. त्यामुळे उद्योजक महाराष्ट्रात यायला तयार नाहीत बाहेर राज्यात जाणे पसंत करतात. जर उद्योजक बाहेर राज्यात गेले तर राज्याचे उत्पन्न कमी होईल जीएसटी, कर बुडेल विकासाची कामे करता येणार नाही. असे मत राज्याचे माजी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केले. मंचर ता. आंबेगाव येथे जलसंपदा विभाग महाराष्ट्र शासन महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ पुणे आयोजित जल व्यवस्थापन कृती २०२५ कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी ते म्हणाले की १९९० पूर्वी आंबेगाव तालुक्याची दुष्काळी तालुका म्हणून ओळख होती १९७८ ला डिंभे धरणाचे भूमिपूजन झाले १९९० साली पाणी मिळण्यास सुरुवात झाली डिंभे धरणाच्या पाण्यामुळे आपला परिसर सुजलाम सुफलाम झाला आहे. मात्र आता काही जण डिंभे धरणाचे पाणी न्यायचा विचार करत आहे. आमचे साडेसात टीएमसी पाणी हक्काचे आहे ते आम्हाला ठेवा व उरलेले पाणी न्या, जुन्नर, पारनेर, शिरूर, आंबेगाव तालुक्यातील बंधार्यांना जर पाणी मिळाले नाही तर उन्हाळ्यात काय परिस्थिती निर्माण होईल ? त्यामुळे प्रत्येकाने पाण्याचा काटकसरीने वापर करणे गरजेचे आहे असेही वळसे पाटील म्हणाले.
दैनंदिन जीवनात मानवाच्या आयुष्यात पाणी व वीज हे महत्त्वाचे घटक असून भविष्यात पाणी व्यवस्थापन कसे करायचे, पाहण्याचे स्रोत शोधून त्याचे संवर्धन कसे करायचे याबाबत मार्ग शोधणे आवश्यक आहे. तसेच विजेची समस्स्या देखील मोठी असून २० ते २५ वर्षांपूर्वीची लोकसंख्या व आताची लोकसंख्या यात मोठा फरक आहे. पाण्याचा विजेचा वापर दिवसेंदिवस वाढत आहे. आपल्या धरणात १३ टी.एम.सी पाणी साठा उपलब्ध असतो त्यामुळे पाण्याचा वापर जपून करणे गरजेचे आहे.
▪️माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील
जलसंपदा विभाग महाराष्ट्र शासन महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ पुणे आयोजित जल व्यवस्थापन कृती पंधरवडा २०२५ कार्यक्रम राबविण्यात आला असून या कार्यक्रमाद्वारे जलसंपदा विभागाचे कर्मचारी, अधिकारी, यांनी अधिक प्रभावीपणे काम करणे, वसुली करणे, पाणी परवाने, अनुदान वाटप, विवीध दाखले देणे, यांसह विवीध कामे चांगली करण्यासाठीं या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. भविष्यात पाणी प्रश्न गंभीर होणारं असून प्रत्येक शेतकऱ्यांनी आपली पाणी पट्टी भरणे गरजेचे आहे.
▪️प्रशांत कडूसकर कार्यकारी अभियंता