अवसरी खुर्द ता. आंबेगाव येथील न्हावीवाडा वस्तीवर ग्रामपंचायत नागरी सुविधा पुरविण्यास जाणीवपूर्वक टाळाटाळ करत असून स्वातंत्र्यापासून न्हावीवाडा या वस्तीवर बंदिस्त गटार योजना नाही, पुरेशा प्रमाणात पथदिवे नसल्याने रात्रीच्या वेळी अंधार असतो, नळाला दिवसाआड पाणी येते व तेही दिवसभरात कधी येईल ते सांगता येत नाही, मोटरसायकल जाईल एवढाच रस्ता आहे. काही रहिवाशांनी रस्त्यावर पायऱ्या बांधल्या असल्याने चार चाकी गाड्याना ये-जा करता येत नाही, अनेकदा नागरिकांना एखाद्या चौकात गाडी लावून आतमध्ये यावे लागत आहे. सबंधित ठेकेदाराने एक महिना पूर्वी न्हावीवाड्यात बंदिस्त गटार योजना राबविण्यासाठी सिमेंटचे पाईप आणून ठेवले आहेत. परंतु अद्याप गटर योजनेचे काम चालू न झाल्याने स्थानिक रहिवाशांनी संताप व्यक्त केला आहे.
अवसरी खुर्द गावठाण अंतर्गत न्हावीवाडा, वडारवस्ती, लोहारवस्ती आहे या तीनही वस्तीवर ग्रामपंचायतीने स्वातंत्र्यानंतर अद्याप पर्यंत गटार योजना, पुरेशा प्रमाणात पथदिवे अशा नागरी सुविधा पुरविण्यास हलगर्जीपणा केला आहे. गटारी योजना करण्यासाठी संबंधित ठेकेदाराने एक महिन्यापूर्वी ४० ते ४५ सिमेंटचे पाईप आणून ठेवले आहेत मात्र काम करण्या अगोदरच त्यातील २० ते २५ पाईप ठेकेदार ट्रॅक्टर मध्ये घेऊन गेल्याने येथील गटार योजना होणार की नाही ? असा प्रश्न स्थानिक रहिवाशांना पडला आहे. न्हावीवाड्यात काही रहिवाशांनी अतिक्रमण करून घराचा समोर ओटे बांधले असल्याने पायी ये जा करणे मुश्किल झाले असून ग्रामपंचायतने रस्त्यावरील अतिक्रमण काढून मोठा रस्ता बनवावा तसेच न्हावीवाडा व वडार वस्ती परिसरात विद्युत वितरण कंपनीचे खांब पुरेसे नसल्याने रात्रीच्या वेळी परिसरात अंधाराचे साम्राज्य असते. ग्रामपंचायतीच्या माध्यमातुन गावाला दिवसाआड पाणीपुरवठा केला जातो परंतु दिवसभरात नळाला पाणी कधी येईल सांगता येत नसल्याने गोरगरीब कुटुंबातील महिलांना रोजगार बुडवून दिवसाआड घरी थांबावे लागत आहे. ग्रामपंचायत आमच्याकडून दरवर्षी घरपट्टी, पाणीपट्टी, दिवाबत्ती कर वसुल करत आहे. मात्र आम्हाला नागरी सुविधा पुरविण्यात हलगर्जीपणा करत आहे. असा आरोप न्हावीवाडा येथील ग्रामस्थ करत आहे.
याबाबत सरपंच वैभव वायाळ यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की न्हावीवाडा येथे गटार योजनेचे काम चालू करण्यासाठी सिमेंट पाईप ग्रामपंचायतीने आणले असून ग्रामपंचायत स्वतः काम करणार आहे. कामगार मिळत नसल्याने काम रखडले असून थोड्याच दिवसात काम चालू होणार आहे. रस्त्याच्या कामाचा प्रस्ताव सुद्धा पाठवला असून तो प्रश्नही लवकर मार्गी लागेल.