कळंब गावच्या हद्दीत जादुटोण्याचा प्रकार ; दोघांवर गुन्हा दाखल


कळंब ता. आंबेगाव गावच्या हद्दीत रसिका रोहन भालेराव यांच्या शेतात काळ्या रंगाच्या कापडी चार बाहुल्या व टाचण्या टोचलेली चार लिंब, अंगारा टाकलेला नारळ मिळून आला असून सदर प्रकार हा फिर्यादी यांच्या मनात भीती निर्माण करण्यासाठीं कऱण्यात आला असल्याची फिर्याद रसिका मोहन भालेराव यांनी मंचर पोलीस ठाण्यात दिली आहे.

पोलीसांनी दिलेली माहिती अशी की फिर्यादी रसिका भालेराव वय ४५ या व्यवसायानिमीत्त बाणेर पुणे येथे राहत असुन त्यांची कळंब तालुका आंबेगाव येथे शेती आहे. दिनांक ८/४/२०२४ त्यांची शेती असलेल्या दगडीमळा येथील शेतात फिर्यादीची चुलत सासू प्रिया बिपिन भालेराव व चुलत सासरे बिपिन वामन भालेराव ( दोघे रा. कळंब तालुका आंबेगाव) यांनी फिर्यादीचे जमिनीचे गेटच्या बाजूने तुटलेल्या जाळीतून अनाधिकाराणे आत प्रवेश करून शेतात वेगवेगळ्या ठिकाणी चार काळे रंगाचे टाचण्या टोचलेल्या चार कापडी बाहुल्या, व टाचण्या टोचलेली चार लिंब, नारळ व त्यावर काळे रंगाचा अंगारा असलेल्या वस्तू टाकल्या त्यावेळीं शेतात असलेला शेतकामगार नितीन शेळके याने त्यांना तूम्ही शेतात का आले असे विचारले असता त्यांनी शेतमजुरासही दमदाटी केली आहे. या बाबत प्रिया बिपिन भालेराव, बिपिन वामन भालेराव यांच्यावर जादूटोणा कायद्यांतर्गत मंचर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्रीकांत कंकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस सब इन्स्पेक्टर रागिणी कराळे पुढील तपास करत आहे.