पुलाच्या अर्धवट कामाचा ग्रामस्थांना मनस्ताप ; अनेक महिन्यापासून ठेकेदार गायब


टाव्हरेवाडी ता. आंबेगाव येथील अवसरी बुद्रुक ते टाव्हरेवाडी – पिंपळगाव रस्त्यावरील असणाऱ्या ओढ्यावरील स्मशानभूमी शेजारी गेल्या काही महिन्यांपूर्वी मंजूर झालेले पुलाचे काम ठेकेदाराने अद्यापही पूर्ण केले नसल्याने ऐन पावसाळ्यात स्थानिक ग्रामस्थांना याचा मनस्ताप सहन करावा लागत आहे. अर्धवट अवस्थेत असलेल्या या कामाकडे ठेकेदार फिरकला देखील नसल्याचे स्थानिक ग्रामस्थ सांगत आहेत. दोन, तीन दिवसापूर्वी झालेल्या पावसामुळे या पुलाच्या शेजारी तात्पुरत्या स्वरूपात बनवलेल्या पुलावरून पाणी गेल्याने नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला होता. त्यामुळे अर्धवट असलेल्या पुलाचे काम संबंधित ठेकेदाराने तात्काळ सुरू करावे अशी मागणी आंबेगाव तालुका सरपंच परिषद अध्यक्ष उत्तमराव टाव्हरे यांनी केली आहे.

टाव्हरेवाडी – अवसरी गावाला जोडणाऱ्या ओढ्यावर असणान्या जुन्या पुलाची उंची कमी असल्याने पावसाळ्यात ओढ्याला पूर आल्यावर पुलावरून पाणी वाहत असे. त्यामुळे शाळेच्या मुलांची, दुध, पालेभाज्या, करणारी तसेच सर्व टाव्हरे वाडीतील ग्रामस्थांची वाहतूक ठप्प होत होती. काही वर्षापूर्वी या छोट्या पुलावरून शाळेची सुट्टी झाल्यावर या पुलावरून जात असताना मुलांना अंदाज न आल्याने एक मुलगा वाहून गेला होता. तसेच शेतकऱ्यांना आणि प्रवाशांना कमी उंचीच्या पुलावरून अनेक अडचणीला सामोरे जावे लागतं होते. त्यावेळी, कृषी उत्पन्न बाजार समिती माजी संचालक बाळासाहेब टाव्हरे ,लोकनियुक्त माजी सरपंच उत्तम टाव्हरे यांनी माजी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे सतत पाठपुरावा करत या ठिकाणी नवीन पुल व्हावा अशी मागणी केली होती. त्यानंतर माजी सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील व जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांच्या प्रयत्नातून नवीन पुलासाठी सुमारे ६० लाख रुपयांचा निधी मंजूर होऊन पुलाचे काम सुरू झाले होते. मात्र गेल्या काही महिन्यांपासून हे काम बंद पडले आहे. टाव्हरेवाडी येथे ये – जा करण्यासाठी या पुलाचे काम सुरू असताना या पुलाच्या शेजारी तात्पुरत्या स्वरूपात दुसरा पूल बांधण्यात आला आहे. मात्र दोन-तीन दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे या तात्पुरत्या स्वरूपात बांधलेल्या पुलावरून देखील मोठ्या प्रमाणात पाणी वाहू लागले आहे. त्यामुळे नागरिकांना पुन्हा एकदा मनस्ताप सहन करावा लागला आहे. पुलाचे काम करणारा संबंधित ठेकेदार गेले काही दिवस इकडे फिरकलाच नसल्याचे बोलले जात आहे. संबंधित ठेकेदाराने नविन पुलाचे काम तात्काळ पूर्ण करावे व स्थानिक ग्रामस्थांची समस्या दूर करावी अशी मागणी टाव्हरेवाडी येथील ग्रामस्थांनी केली आहे.